
Tuesday, December 30, 2008
चमत्कृतीपूर्ण, चित्तथरारक आयर्न मॅन

तिस्ता

"विचारवेध'च्या वेशीवर
-सिद्धार्थ ताराबाई गंगाराम
Tuesday, September 2, 2008
भग्न वसुंधरेकाठी...

तुम्ही "फाईंडिंग निमो' पाहिलाय? दिग्दर्शक ऍण्ड्य्रू स्टॅण्टनने या ऍनिमेशनपटातून एका माशाच्या सुटकेचं नाट्य रंगविलं आणि समुद्रसफरीतून पाण्याखालील विश्वाचं अफलातून दर्शन घडवलं. "वॉल-ईम'मध्ये तो आपल्याला भग्न वसुंधरेवरून अवकाश पोकळीत घेऊन जातो. पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवलं नाही, तर शेकडो वर्षे अवकाशात राहणारे आणि सर्व दैनंदिन क्रिया "रोबो'च्या मदतीनं करणारे निव्वळ मांसाचे गोळे म्हणजे आपणच असू, असा धोक्याचा इशारा तो देतो. अर्थात हा इशारा कोरडा नाही, त्याला जोड आहे ती एका नितांत सुंदर प्रेमकथेची. "वॉल-ई'ची पटकथा स्टॅण्टन आणि जिम रेर्डनने लिहिली आहे. ती इतकी सरळ, बांधेसूद आणि अनेक नजाकतींनी नटलेली आहे की ती आपल्याला सहजपणे गुंतवत नेते आणि चित्रपट संपला आहे, श्रेयनामावली सुरू झाली आहे याची जाणीव होऊनही आपण त्याच्या प्रभावाखाली त्याच अवस्थेतच राहतो.
विध्वंसानंतर तब्बल 700 वर्षे लोटली आहेत. पृथ्वीवर फक्त डेब्रिस, माती आणि धुळीचं साम्राज्य सोडलं तर आता काहीही शिल्लक नाही. आपल्या अतिप्रगत मेंदूचा वापर करून माणसाने हे विश्व घडवलं आणि बिघडवलंही. त्यानेच वसुंधरेला भग्नावस्थेत ढकललं. आता उरलेत ते केवळ ढिगारे, इमारतींचे भग्नावशेष; इथे पूर्वी माणसं राहत होती असं सांगणारे. पृथ्वीवर राहण्यालायक वातावरणच उरलं नाही. त्यामुळे सगळी मानवजात अवकाश पोकळीतील अवाढव्य आणि सुसज्ज अशा अवकाशयानात पाच वर्षांच्या बोलीवर राहावयास गेली आहे; पण पाचपन्नास नव्हे, तर 700 वर्षे झाली, पृथ्वीवर परत जाण्यायोग्य परिस्थितीच निर्माण होऊ शकली नाही. वॉल-ईचे हजारो वंशज पृथ्वीवरील प्रदूषण हटविता-हटविता जागेवर बसले. बिचारा वॉल-ई एकटाच उरला आहे. न थकता पृथ्वीवरची घाण साफ करतो आहे. त्याला सोबत आहे ती एका निरुपयोगी झुरळाची. माणसाने स्वतःच्या चुकीमुळे उद्या पृथ्वीवरची सजीवसृष्टी नष्ट केलीच तर एक सजीव मात्र तो नष्ट करू शकणार नाही, तो म्हणजे झुरळ, हे वैज्ञानिक सत्य तो अधोरेखित करतो. स्वतःच्या मुळावर उठलेल्या माणसाला वाकुल्या दाखवणारा हा कीटक क्षुल्लक असला तरी माणूसच त्याच्यापुढे क्षुल्लक ठरतो, असं सांगण्यासाठी झुरळाचा केलेला प्रतीकात्मक वापर अप्रतिम.
हा वॉल-ई म्हणजे माणूस असणं अशक्य. मग आहे तरी कोण? (थअङङ-ए अर्थात थरीींश अश्रश्रेलरींळेप ङेरव ङळषींशी- एरीींह उश्ररीी) संगणकावर ऍनिमेशनच्या तंत्राने निर्माण केलेलं एक अफालातून पात्र. एरवी पटकथेत व्यक्तिचित्रणाच्या नावाने बोंब असली तर एकूण सिनेमाचा शिमगा होतो. इथे तर मुख्य पात्र मनुष्येत्तर आहे. तरीही त्याच्या हालचाली यांत्रिकपणे होत नाहीत, हीच तर गंमत आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची लय, समन्वय आहे. त्या इतक्या कल्पक, रंजक आणि अस्सल आहेत की त्यांतून कधी हास्याचे फवारे उडतात, तर कधी धबधबे कोसळतात आणि आपल्याला अंतर्मुखही करतात.
वर्षानुवर्षे एकाकी असलेऱ्या "वॉल-ई'च्या रखरखीत जीवनात "इव्ह' येते. या प्रेमकथेत प्रथम पाहिल्यानंतर कलिजा खल्लास होणं, नजरानजर, घालमेल, हसणं, लाजणं, मुरडणं, नजरेनं बोलणं वगैरे भावना आणि धुळीच्या वादळातून, जीवारच्या संकटातून इव्हला वाचविण्यासाठीची या प्रेमविराची धडपड, तगमग, ऍण्ड्य्रू स्टॅण्टन यांनी साधलेली ही किमया अचंबित करते.
"इव्ह'च्या काळजीने तिला घेऊन जाणाऱ्या स्पेस शटलला पकडून वॉल-ई अवकाशयानात प्रवेश करतो. तेथील मांसाचे गोळे होऊन पडलेली माणसे, त्यांची "सेवा' करणारे रोबो हे सगळं पाहिल्यावर वॉल-ई बावरून जातो. त्याची त्रेधा, त्याचं बुजरेपण यातून जी धमाल उडते तीही मस्तच. मानवी भावभावनांचा इतका संमिश्र आणि गुंतागुंतीचा आविष्कार घडविणे एखाद्या कसलेल्या नटालाही अशक्य व्हावं.
चित्रपटाचा शेवट सुखान्त आणि शोकात्मही आहे. पण तो तसा असण्यामागे मोठी गुंतागुंत आहे. पृथ्वीवरील अवशेषांमध्ये वॉल-ईला सापडलेला एक बीजांकुर म्हणजे मनुष्य जातीसाठी आशेचा किरण आणि इव्ह व "वॉल-ई'मधील प्रेमांकुर. पृथ्वी ते अवकाश आणि अवकाश ते पुन्हा पृथ्वी असा त्याचा नाट्यमय आणि संघर्षमय प्रवास हा मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने या सिनेमाला टाळणं म्हणजे स्वतःची फसवणूक.
- सिद्धार्थ ताराबाई
Wednesday, June 18, 2008
कल्पनेच्या अचाट, अद्भुत दुनियेत...

- सिद्धार्थ ताराबाई
Sunday, April 20, 2008
जीवघेणी तरीही देखणी परिकथा

Saturday, April 5, 2008
दृष्टीआडची "दृष्टी'

Tuesday, March 18, 2008
अ टेल ऑफ गोल्डन बुद्धा
किती निकुंभ सरांना मोडीत काढलं आपण आतापर्यंत? नि "इशान'सारख्या किती क्रिएटिव्ह पोरांना ढकललं "ढ'च्या यादीत! तसे निकुंभ सर असतात प्रत्येक शाळेत. ते फोडत असतात घसा बेंबीच्या देठापासून, ""नसतातच मुलं "ढ' मुळात. हुशार, बुद्धिमान असतं प्रत्येक मूल. वेगळं, परस्परांहून भिन्न. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. त्याचं असतं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. त्याचं असतं स्वतःचं जग जगावेगळं. त्याच्या असतात कल्पना कल्पनातीत. ते विचार करतं स्वतंत्रपणे. आभाळाएवढी असतात त्याची स्वप्नं.'' हे असं सांगणाऱ्या शिक्षकावरच कशाला, कुणावरही विश्वास ठेवतो आपण? त्याला ठार वेडा ठरवतो. तर विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्वास टाकणारा. त्यांच्यातील प्रतिभेला आभाळाचा कॅनव्हास देणारा. पालकांना मुलांशी नव्यानं सुसंवाद करायला लावणारा आणि "उन्हाळ्याची सुट्टी मुलांना पावसाळ्यात का नाही', असा विचित्र प्रश्न विचारणारा "अभिज्ञान अकादमी'चा वेडा शिक्षक - प्रा. विजय जामसंडेकर. त्यांच्याच एका प्रयोगाची नव्हे, एकपात्री भावसंवादाची ही गोष्ट. ही गोष्ट आहे शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाची आणि "मी माझ्यासाठी नवे आभाळ निर्माण करीन', असे सांगणाऱ्या "बाळा'ची. गोष्ट "ढ' ठरवून शाळेतून हाकललेल्या; पण सारं जग आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने प्रकाशमान करणाऱ्या "टॉमी'ची. गोष्ट आहे हुशार चुणचुणीत; पण "म' मानगुटीवर बसेल म्हणून "ग' काढणं टाळणाऱ्या चिंटूची. गोष्ट आहे आईच्या हातून महागडा कप फुटल्यावर तिचे अश्रू पुसत, अगं आई होते, अशी चूक हातून नकळत कधीतरी, असं समजावणाऱ्या पिंकीची. गोष्ट आहे आंधळी कोंशिबीर खेळताना बबलीला धक्का लागल्यानंतर "बघून नाही का खेळता येत तुला', अशी आईची बोलणी खाणाऱ्या बंटीची. गोष्ट आहे अभ्यासात मागे पडणाऱ्या हुशार मुलांची आणि गणितातल्या शेवटच्या पानावर उत्तर असलेल्या; पण न सुटणाऱ्या अवघड समीकरणाची. गोष्ट आहे आपल्या मुलाला वाढविताना दुसऱ्याचे मूल डोक्यात ठेवणाऱ्या पालकांची आणि गोष्ट आहे आपल्या आई-वडिलांवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या मुलांची. एकदा काय झालं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं- मुलांनो, आभाळ कोसळलं तर तुम्ही काय कराल? ""गुरुजी, मी घरात पळून जाईन'', ""गुरुजी, मी आईच्या कुशीत शिरेन'', ""गुरुजी, गुरुजी मी की नाही ग्रह-तारे वेचीन.'' बाळ, तू काय करशील आभाळ कोसळलं तर? मघापासून गप्प असलेल्या त्या मुलाला गुरुजींनी विचारलं. ""गुरुजी, मी माझ्यासाठी नवीन आभाळ निर्माण करीन.'' त्याचं हे उत्तर ऐकून शिक्षकही अवाक्. कोण होता तो विद्यार्थी? याच मुलानं पुढे दहावीत नापास झालेल्या आपल्या मुलाला सांगितलं, ""तू जोडे शिवलेस तरी माझी हरकत नाही; पण जोडे असे शिव, की लोकांनी म्हटलं पाहिजे चांगले जोडे हवे असतील ना, तर टिळकांच्या घरी जा.'' घरातल्या आजच्या संवादातील हे शब्द ः ""किती नालायक मुलगा आहेस तू'', ""किती बेअक्क्ल मुलगी आहेस तू'', ""हे काय गुण आहेत; वर्षभर नको तिकडे गुण उधळल्यावर याशिवाय दुसरं काय मिळणार!'', ""तू हमालीच करणार'', ""आई-बाबा म्हणून मला तुमचा कंटाळा आलाय.'' हे असे संवाद हल्ली परवलीचेच होऊन बसले आहेत. "भोकांड पसरलंस, तर तोंड शिवून टाकीन'', ""नीट ऐकलं नाहीस ना, तर पंख्याला टांगीन'' वरवर साधी वाटणारी ही वाक्यं निष्पाप मुलांच्या भावविश्वावर किती परिणाम करतात! हेच शब्द मुलांचं आयुष्य विस्कटून टाकू शकतात. ""किती गुणी मुलगा आहेस तू माझा'', ""किती हुशार लेक आहेस तू माझी'', ""पंचाहत्तर टक्के वा छान, पुढच्या वर्षी तुला यापेक्षा अधिक गुण मिळतील'', ""तुम्ही माझे किती प्रेमळ आई-बाबा आहात'', संवाद असा बदलला तर? आपल्या मुलांचं आयुष्यच बदलून जाईल. केवळ संवादाचे शब्द बदलल्याने बदललेले पालक आणि मुलं यांच्याशी सर आपला परिचय करून देतात आणि मुलांच्या आभाळाएवढ्या स्वप्नांची दुनियाही आपल्यासमोर उभी करतात. आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल तेजस्वी, अलौकिक, असामान्य, एकमेवाद्वितीय, प्रतिभावंत, प्रज्ञावंत आहे; पण आपण मात्र आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा, महत्त्वांकांक्षांनी त्याचं तेज झाकोळून टाकतो, शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाप्रमाणे. तुमच्या मुलांतील तेजस्वी बुद्धाची प्रचीती हवी असेल, तर हे लिंपण खरवडून काढा. सरांचे हे आवाहन आपल्याला आरपार बदलून टाकतं. "आभाळ आहे म्हणोनी' हा दोन सव्वादोन तासांचा भावसंवाद. अनेक किस्से, छोट्या छोट्या "मोठ्या' गोष्टींनी गोष्टीवेल्हाळ झालेला. त्याला अर्थपूर्ण संगीत आणि प्रकाशयोजनेची साथ आहे. त्यामुळे त्यातील आशय अधिकच गडद झाला आहे. लौकिक अर्थाने "ढ' ठरविलेल्या, हाती शून्य घेऊन संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणाऱ्या अनेक अलौकिक व्यक्तिमत्त्वांशी आपली नव्याने ओळख करून देतात. सर आपल्याला थेट मुलांच्या भावविश्वात घेऊन जातात, तिथेच गुंतवून ठेवतात. तेथून बाहेर पडतो, तेव्हा आपली विचार करण्याची पद्धतच बदललेली असते. मनात अपराधी भावना असते. "आपलं चुकलंच आता तरी बदलायला हवं', मन आपल्याला बजावत असतं. ""आपलं मूल हे जगावेगळं आहे. आपण त्याला नव्यानं समजून घ्यायला हवं. चुका दाखवीत नव्हे, शिक्षा करून नव्हे; तर चुकांमधून त्याला शिकवायला हवं'', अशी खूणगाठ आपण बांधलेली असते. मुलांच्या मनातलं आभाळाएवढं स्वप्न साकारण्यासाठी आतला आवाज आता साद घालत असतो, एक नवा जन्म झाल्याची अनुभूती घेऊन आपण बाहेर पडतो. गणिताच्या पुस्तकातले ते शेवटच्या पानावर उत्तर असलेलं कठीण समीकरणही आता कुठे सुटू लागलेलं असतं. अशा बेसावध वेळी सर पुन्हा आपल्याला गाठतात, विचारतात, ""आयुष्याच्या स्वप्नवेड्या प्रवासात, मस्तीखोर, खट्याळ, रडणारी, हसणारी, बागडणारी आपली प्रतिभावंत मुलं आपल्यासोबत असताना अचानक आभाळच कोसळलं, तर तुम्ही काय कराल?'' उत्तर आपल्याला मिळालेलं असतं, समीकरण सुटलेलं असतं.
- सिद्धार्थ ताराबाई ...
(Sakaal : 24/02/08
चांगल्या कल्पनेची... माती!
