Tuesday, March 18, 2008

अ टेल ऑफ गोल्डन बुद्धा

प्रा. विजय जामसंडेकर यांच्या "आभाळ आहे म्हणोनी' या भावसंवादाचे प्रयोग सध्या मराठी रंगभूमीवर सुरू आहेत. पालकांनी आवर्जून अनुभवावा असा हा भावसंवाद आपल्याला मुलांच्या पुन्हा प्रेमात पडायला लावतोच शिवाय अंतर्मुख करतो आणि पालक म्हणून आपल्याला नवा जन्मही देतो... ...

किती निकुंभ सरांना मोडीत काढलं आपण आतापर्यंत? नि "इशान'सारख्या किती क्रिएटिव्ह पोरांना ढकललं "ढ'च्या यादीत! तसे निकुंभ सर असतात प्रत्येक शाळेत. ते फोडत असतात घसा बेंबीच्या देठापासून, ""नसतातच मुलं "ढ' मुळात. हुशार, बुद्धिमान असतं प्रत्येक मूल. वेगळं, परस्परांहून भिन्न. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. त्याचं असतं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. त्याचं असतं स्वतःचं जग जगावेगळं. त्याच्या असतात कल्पना कल्पनातीत. ते विचार करतं स्वतंत्रपणे. आभाळाएवढी असतात त्याची स्वप्नं.'' हे असं सांगणाऱ्या शिक्षकावरच कशाला, कुणावरही विश्‍वास ठेवतो आपण? त्याला ठार वेडा ठरवतो. तर विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्‍वास टाकणारा. त्यांच्यातील प्रतिभेला आभाळाचा कॅनव्हास देणारा. पालकांना मुलांशी नव्यानं सुसंवाद करायला लावणारा आणि "उन्हाळ्याची सुट्टी मुलांना पावसाळ्यात का नाही', असा विचित्र प्रश्‍न विचारणारा "अभिज्ञान अकादमी'चा वेडा शिक्षक - प्रा. विजय जामसंडेकर. त्यांच्याच एका प्रयोगाची नव्हे, एकपात्री भावसंवादाची ही गोष्ट. ही गोष्ट आहे शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाची आणि "मी माझ्यासाठी नवे आभाळ निर्माण करीन', असे सांगणाऱ्या "बाळा'ची. गोष्ट "ढ' ठरवून शाळेतून हाकललेल्या; पण सारं जग आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने प्रकाशमान करणाऱ्या "टॉमी'ची. गोष्ट आहे हुशार चुणचुणीत; पण "म' मानगुटीवर बसेल म्हणून "ग' काढणं टाळणाऱ्या चिंटूची. गोष्ट आहे आईच्या हातून महागडा कप फुटल्यावर तिचे अश्रू पुसत, अगं आई होते, अशी चूक हातून नकळत कधीतरी, असं समजावणाऱ्या पिंकीची. गोष्ट आहे आंधळी कोंशिबीर खेळताना बबलीला धक्का लागल्यानंतर "बघून नाही का खेळता येत तुला', अशी आईची बोलणी खाणाऱ्या बंटीची. गोष्ट आहे अभ्यासात मागे पडणाऱ्या हुशार मुलांची आणि गणितातल्या शेवटच्या पानावर उत्तर असलेल्या; पण न सुटणाऱ्या अवघड समीकरणाची. गोष्ट आहे आपल्या मुलाला वाढविताना दुसऱ्याचे मूल डोक्‍यात ठेवणाऱ्या पालकांची आणि गोष्ट आहे आपल्या आई-वडिलांवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या मुलांची. एकदा काय झालं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं- मुलांनो, आभाळ कोसळलं तर तुम्ही काय कराल? ""गुरुजी, मी घरात पळून जाईन'', ""गुरुजी, मी आईच्या कुशीत शिरेन'', ""गुरुजी, गुरुजी मी की नाही ग्रह-तारे वेचीन.'' बाळ, तू काय करशील आभाळ कोसळलं तर? मघापासून गप्प असलेल्या त्या मुलाला गुरुजींनी विचारलं. ""गुरुजी, मी माझ्यासाठी नवीन आभाळ निर्माण करीन.'' त्याचं हे उत्तर ऐकून शिक्षकही अवाक्‌. कोण होता तो विद्यार्थी? याच मुलानं पुढे दहावीत नापास झालेल्या आपल्या मुलाला सांगितलं, ""तू जोडे शिवलेस तरी माझी हरकत नाही; पण जोडे असे शिव, की लोकांनी म्हटलं पाहिजे चांगले जोडे हवे असतील ना, तर टिळकांच्या घरी जा.'' घरातल्या आजच्या संवादातील हे शब्द ः ""किती नालायक मुलगा आहेस तू'', ""किती बेअक्‍क्‍ल मुलगी आहेस तू'', ""हे काय गुण आहेत; वर्षभर नको तिकडे गुण उधळल्यावर याशिवाय दुसरं काय मिळणार!'', ""तू हमालीच करणार'', ""आई-बाबा म्हणून मला तुमचा कंटाळा आलाय.'' हे असे संवाद हल्ली परवलीचेच होऊन बसले आहेत. "भोकांड पसरलंस, तर तोंड शिवून टाकीन'', ""नीट ऐकलं नाहीस ना, तर पंख्याला टांगीन'' वरवर साधी वाटणारी ही वाक्‍यं निष्पाप मुलांच्या भावविश्‍वावर किती परिणाम करतात! हेच शब्द मुलांचं आयुष्य विस्कटून टाकू शकतात. ""किती गुणी मुलगा आहेस तू माझा'', ""किती हुशार लेक आहेस तू माझी'', ""पंचाहत्तर टक्के वा छान, पुढच्या वर्षी तुला यापेक्षा अधिक गुण मिळतील'', ""तुम्ही माझे किती प्रेमळ आई-बाबा आहात'', संवाद असा बदलला तर? आपल्या मुलांचं आयुष्यच बदलून जाईल. केवळ संवादाचे शब्द बदलल्याने बदललेले पालक आणि मुलं यांच्याशी सर आपला परिचय करून देतात आणि मुलांच्या आभाळाएवढ्या स्वप्नांची दुनियाही आपल्यासमोर उभी करतात. आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल तेजस्वी, अलौकिक, असामान्य, एकमेवाद्वितीय, प्रतिभावंत, प्रज्ञावंत आहे; पण आपण मात्र आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा, महत्त्वांकांक्षांनी त्याचं तेज झाकोळून टाकतो, शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाप्रमाणे. तुमच्या मुलांतील तेजस्वी बुद्धाची प्रचीती हवी असेल, तर हे लिंपण खरवडून काढा. सरांचे हे आवाहन आपल्याला आरपार बदलून टाकतं. "आभाळ आहे म्हणोनी' हा दोन सव्वादोन तासांचा भावसंवाद. अनेक किस्से, छोट्या छोट्या "मोठ्या' गोष्टींनी गोष्टीवेल्हाळ झालेला. त्याला अर्थपूर्ण संगीत आणि प्रकाशयोजनेची साथ आहे. त्यामुळे त्यातील आशय अधिकच गडद झाला आहे. लौकिक अर्थाने "ढ' ठरविलेल्या, हाती शून्य घेऊन संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणाऱ्या अनेक अलौकिक व्यक्तिमत्त्वांशी आपली नव्याने ओळख करून देतात. सर आपल्याला थेट मुलांच्या भावविश्‍वात घेऊन जातात, तिथेच गुंतवून ठेवतात. तेथून बाहेर पडतो, तेव्हा आपली विचार करण्याची पद्धतच बदललेली असते. मनात अपराधी भावना असते. "आपलं चुकलंच आता तरी बदलायला हवं', मन आपल्याला बजावत असतं. ""आपलं मूल हे जगावेगळं आहे. आपण त्याला नव्यानं समजून घ्यायला हवं. चुका दाखवीत नव्हे, शिक्षा करून नव्हे; तर चुकांमधून त्याला शिकवायला हवं'', अशी खूणगाठ आपण बांधलेली असते. मुलांच्या मनातलं आभाळाएवढं स्वप्न साकारण्यासाठी आतला आवाज आता साद घालत असतो, एक नवा जन्म झाल्याची अनुभूती घेऊन आपण बाहेर पडतो. गणिताच्या पुस्तकातले ते शेवटच्या पानावर उत्तर असलेलं कठीण समीकरणही आता कुठे सुटू लागलेलं असतं. अशा बेसावध वेळी सर पुन्हा आपल्याला गाठतात, विचारतात, ""आयुष्याच्या स्वप्नवेड्या प्रवासात, मस्तीखोर, खट्याळ, रडणारी, हसणारी, बागडणारी आपली प्रतिभावंत मुलं आपल्यासोबत असताना अचानक आभाळच कोसळलं, तर तुम्ही काय कराल?'' उत्तर आपल्याला मिळालेलं असतं, समीकरण सुटलेलं असतं.


- सिद्धार्थ ताराबाई ...


(Sakaal : 24/02/08

चांगल्या कल्पनेची... माती!


सात आंधळे आणि एका हत्तीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे? या गोष्टीच्या नेमका विरुद्ध प्रकार इथे घडतो. इथे आंधळे नाहीत तर डोळस आहेत, तेही सात नव्हे आठ. तिथे हत्ती आहे, तर इथे एक घटना आहे. ही घटना साधीसुधी नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षाच्या हत्येचा प्रयत्न. आता हॉलिवूडपट म्हटल्यावर त्यात दुसऱ्या कोणा सोम्या-गोम्याच्या हत्येचा प्रयत्न दाखवून चालणारच नाही. तर ही घटना घडते तेव्हा ती आठ वेगवेगळ्या साक्षीदारांकडून पाहिली जाते. तेच आय विटनेस असतात. त्यात असते "सीएनएन' नव्हे तर "जीएनएन' या वृत्तवाहिनीची निर्माती, मि. प्रेसिडेंट यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला एजंट, मि. प्रेसिडेंट यांच्या उपस्थितीत होणाऱ्या त्या ऐतिहासिक कराराच्या चित्रीकरणासाठी आलेला हौशी अमेरिकी पर्यटक, खुद्द दहशतवादी आणि इतरही. आठ साक्षीदार आपल्याला मि. प्रेसिडेंट यांच्या हत्येचा प्रयत्न आणि त्यानंतर काही क्षणांत झालेली बॉम्बस्फोटाची घटना सांगतात. या आठ साक्षीदारांच्या नजरेतून एकच घटना आपल्याला आठ वेळा पडद्यावर पाहावी लागते, म्हणण्यापेक्षा सहन करावी लागते. सुमारे पंचवीस मिनिटे दिग्दर्शक (पेट ट्रॅव्हीस) आपल्याला तेच ते आणि तेच ते पाहण्यास भाग पाडतो. चित्रपटाची गोष्ट पुढं सरकतच नाही. प्रेक्षकांनी एकदा पडद्यावर घटना पाहिल्यावर पुन्हा आठ साक्षीदारांच्या नजरेतून ती घटना दाखवून दिग्दर्शकाने आपला छळ का केला ते नव्वदाव्या मिनिटापर्यंत कळत नाही. अर्थात नव्वदाव्या मिनिटांपर्यंत आपण थांबलो तर! अकिरा कुरोसावा यांनी "राशोमान'मध्ये केलेला "स्टोरी टेलिंग'चा अभिनव प्रयोग नंतर काही दिग्दर्शकांनी केला. "राशोमान'मध्ये चार वेगवेगळ्या व्यक्तिरेखा एकाच घटनेविषयी वेगवेगळी माहिती देतात. त्या व्यक्तिरेखा सांगत असलेले सत्य त्यांच्यादृष्टीने "सत्य' असतं. कुरोसावा आपल्याला त्या व्यक्तिरेखांमार्फत "राशोमान'ची गोष्ट सांगतात. 1996 मध्ये आलेल्या डेन्झेल वॉशिंग्टनचा "करेज अन्डर फायर' हाही चित्रपट "राशोमान'च्या "स्टोरी टेलिंग'शी साम्य दाखवतो. या युद्धपटातल्या व्यक्तिरेखा स्वतःला वाचविण्यासाठी खोटं बोलतात आणि चित्रपटाची गोष्ट पुढे सरकते. "व्हॅन्टेज पॉईंट'मध्ये आठ व्यक्तिरेखांच्या नजरेतून एकच घटना दाखविताना दिग्दर्शकानं प्रत्येक व्यक्तिरेखेला काही वेगळं सांगायला लावलंय का तर तसंही नाही. तर मूळ घटना दाखविताना तिच्या आगे-मागे आणखी काही दृश्‍यांचे तुकडे जोडून गोंधळ निर्माण केलाय. खरं तर पाहिलेल्या एखाद्या आणीबाणीच्या घटनेविषयी प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन, निरीक्षण असू शकतं, ही कल्पना खूपच चांगली होती. पण इतक्‍या चांगल्या कल्पनेचं पटकथा कशी माती करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्हॅन्टेज पॉईंट. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी शिखर बैठकीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ऍश्‍टन (व्हिल्यम हर्ट) आले आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी थॉमस बर्नेस (डेनिस क्वेड) आणि केन्ट टेलर (मॅथ्यू फॉक्‍स) या दोन गुप्तहेर एजंटावर आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या सेंट्रल चौकात मि. प्रेसिडेंट भाषणासाठी येताच त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या जातात. त्यानंतर सेंट्रल चौकात गोंधळ माजतो. मि. प्रेसिंडेट यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला आपण व्हिडीओ कॅमेऱ्यात पकडलंय, अशी तेथे केवळ हौस म्हणून चित्रिकरण करणाऱ्या हॉवर्ड लेव्हीस (फॉरेस्ट व्हिटेकर) या अमेरिकी पर्यटकाची खात्री आहे. हीच घटना "जीएनएन'या वृत्तवाहिनीनेही सर्वात आधी टिपली आहे. हीच घटना मि. प्रेसिडेंट यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या थॉमस बर्नेसनेही पाहिली आहे. काही वेळाने सेंट्रल चौकात शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होतो. शेकडो लोक मरतात. मि. प्रेसिडेंट यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी दिग्दर्शक आपल्याला आठ साक्षीदारांच्या नजरेतून ही घटना पुन्हा-पुन्हा म्हणजे तब्बल आठ वेळा दाखवतो. हॉवर्ड लेव्हीस या अमेरिकी पर्यटकाची व्यक्तिरेखा चित्रपटभर व्यापून राहिली आहे. सेंट्रल चौकातल्या त्या घटनेचा साक्षीदार झालेला, बाम्बस्फोटानंतर ऍना या नऊ-दहा वर्षांच्या मुलीच्या आईचा तिच्यासह शोध घेणारा, दहशतवाद्यांच्या मागे आपला कॅमेरा घेऊन धावणारा आणि शेवटी ऍनाला मोठ्या अपघातातून वाचविणारा हॉवर्ड आपल्या लक्षात राहतो. फॉरेस्ट व्हिटेकर या ऑस्करविजेत्या अभिनेत्याने इतकी दुय्यम भूमिका असूनही ती लक्षणीय केलीय. बॉम्बस्फोट, पाठलाग, गोळ्यांचा वर्षाव, मोटारींची जीवघेणी पळावापळवी यात सापडलेल्या निष्पाप ऍनाचं दर्शन आपल्याला अधूनमधून घडत राहतं. (हे सगळं घडत असताना ऍनाला साधं खरचटतही नाही.) दहशतवाद, बॉम्बस्फोट, गुन्हेगारी यात होरपळ आणि फरपट होते ती कोवळ्या जीवांची, असं तर दिग्दर्शकाला यातून सुचवायचं नाही? श्‍वास रोखून धरायला लावणारे मोटारींचे पाठलाग, मोटारींच्या जीवघेण्या धडका, श्‍वास घेण्यासही वाव न देणारी दृश्‍यमालिका यासाठी साहसपट आवडणाऱ्यांनी हा चित्रपट पाहायला हरकत नाही. पण पंचविसाव्या मिनिटाला कंटाळून थिएटरबाहेर यावं लागू नये म्हणून सुरुवातीची सुमारे वीस मिनिटे बाहेर टाईमपास करून नंतरच आत शिरलेलं बरं. ....

दिग्दर्शक ः पेट ट्रॅव्हीस कलाकार ः डेनिस क्वेड, मॅथ्यू फॉक्‍स, व्हिल्यम हर्ट आणि फॉरेस्ट व्हिटेकर

-सिद्धार्थ ताराबाई

(From : SAKAAL)