Tuesday, December 30, 2008

चमत्कृतीपूर्ण, चित्तथरारक आयर्न मॅन


"स्पायडर मॅन'नंतर "आयर्न मॅन' या सुपरहीरोने मार्व्हल कॉमिक बुकाच्या पानांतून थेट पडद्यावर उडी घेतली आहे. सत्तरच्या दशकात स्टॅनली आणि लॅरी लिबर यांच्या कल्पनाविलासातून साकारलेला "आयर्न मॅन' जोन फावरेयू या दिग्दर्शकाने पडद्यावर आणला आहे. जगाचा विनाश करू पाहणाऱ्या खलप्रवृत्तींना नष्ट करण्याचे सामान्य माणसाचे प्रयत्न जिथे थिटे पडतात किंवा कुचकामी ठरतात तिथेच मग सुपरहीरो जन्म घेतो. हा सुपरहीरो म्हणजे कुठलीही दैवीशक्ती प्राप्त झालेला अतिमानव नाही, तर विज्ञानाच्या चमत्कारातून सिद्ध झालेला सामान्य माणूसच असतो. त्याच्या चिलखतामध्ये सगळं असतं. मिसाईल, रॉकेटस्‌, बुलेट्‌स. विशेष म्हणजे तो विमानाच्या वेगाने अवकाश पालथं घालू शकतो. "आयर्न मॅन'मध्ये चिलखताच्या आत आहे तो टोनी स्टार्क हा शस्रांस्र निर्माता. टोनी स्टार्क आणि त्याचा बिझनेस पार्टनर ओबेदिया स्टेन यांच्यातला चमत्कृतीपूर्ण, चित्तथरारक संघर्ष म्हणजे दोन आयर्न मॅनमधील युद्ध. या युद्धात अर्थातच नायट टोनी जिंकतो आणि खलनायक स्टेनचा विनाश होतो. दोन आयर्न मॅनमधील हे विनाशकारी युद्ध श्‍वास घ्यायचीही उसंत देत नाही. जोन फावरेयू यांनी चित्रपटाला आजच्या काळाचा संदर्भ दिला आहे. त्यासाठी दिग्दर्शक आपल्याला थेट अफगाणिस्तानच्या रखरखीत वाळवंटात घेऊन जातो. तिथे टोनीने बनविलेल्या विनाशकारी मिसाईलची चाचणी यशस्वी होते न होते तोच तालिबानी अतिरेकी टोनीचे अपहरण करून त्याला ओलीस ठेवतात आणि तशाच प्रकारचे विनाशकारी शस्र बनविण्याचं फर्मान सोडतात. अतिरेक्‍यांच्या गुहेतून सुटका करून घेण्यासाठी मिसाईलऐवजी टोनी यांत्रिक चिलखत बनवतो आणि तेथून सुटका करून घेतो. त्याच्या सुटकेचे हे दृश्‍य थराराचा परिसीमा गाठणारं आहे. टोनी स्टार्कची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी (ज्यु) पुढे बाकीच्या व्यक्तिरेखा फिक्‍या वाटतात. किंबहुना रॉबर्ट डाऊनीने अन्य व्यक्तिरेखांना झाकोळून टाकलं आहे. अपवाद फक्त ओबेदिया स्टेनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेफ ब्रिजेसचा. टोनीला नामोहरम करण्यासाठी स्टेन अतिरेक्‍यांशी हातमिळवणी करतो. टोनीने तयार केलेल्या यांत्रिक चिलखतीचा अतिरेक्‍यांनी जमविलेले अवशेष जोडून तो अजस्र चिलखत तयार करतो. इकडे टोनी आपल्या प्रयोगशाळेत रात्रंदिवस खपतो आणि आधीच्यापेक्षा अतिप्रगत चिलखत बनवतो. टोनी आणि स्टेन या दोन "आयर्न मॅन'मधील शेवटचा संघर्ष कधी हवेत, तर कधी जमिनीवर होतो. टोनीने बनविलेले अतिप्रगत चिलखत म्हणजे अनेक वैज्ञानिक प्रयोगांतून तयार केलेलं यंत्रच आहे. त्याच्या करामती शब्दांत वर्णन करण्यापेक्षा पाहण्यात खरी मजा आहे. कॉमिकमधील सुपरहीरो किंवा अतिमानव हे मुलांना समोर ठेवून कल्पिलेले असतात; मात्र "आयर्न मॅन'ला पडद्यावर आणताना दिग्दर्शकाने तो मुलांसाठीचा चित्रपट होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. "स्पायडर मॅन'ने जगभर जाळं टाकलं आणि बख्खळ कमाई केली. "आयर्न मॅन' काय करतो, ते पाहायचं.

- सिद्धार्थ ताराबाई

तिस्ता


ति स्ता सेटलवाड नावाच्या बाईने पुन्हा एक वादळ अंगावर घेतलं आहे. तिने थेट नांदेडचा स्फोट आणि समझोता एक्‍स्प्रेसमधील स्फोटाचा संबंध जोडला आहे. दोन्ही स्फोटांतील स्फोटके सारखीच आहेत, असा तिचा दावा आहे. नांदेडच्या स्फोटामागील धागेदोरे शोधण्याचे काम "कन्सर्न सिटीझन्स इन्क्‍वायरी' या तिच्याच संस्थेने नेमलेल्या सत्यशोधन समितीने केले आहे. नांदेडचा स्फोट हा गॅस सिलिंडर्सचा स्फोट नव्हता; तर तो रासायनिक स्फोट होता, असा निष्कर्ष निवृत्त न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने काढला आहे. नांदेड स्फोटाशी हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध असल्याचे पुरावे सादर करून तिस्ता थांबली नाही तर तिने चौकशीची मागणीही केली आहे. समझोतामधील स्फोटाशी हिंदुत्ववादी संघटनांचाच संबंध असल्याकडेही तिचा रोख आहे. तिस्ता "कम्युनॅलिझम कॉम्बॅट' नावाचे नियतकालिक चालविते. ती मुळची पत्रकार-कार्यकर्ती. पण बोरूबहाद्दर किंवा बोलकी पत्रकार नाही, तर कृतीवर आधारलेली सामाजिक बांधिलकी ती मानते आणि जपतेही. 1992-93च्या दंगलीत ती इतर एनजीओवाल्यांप्रमाणे घरात बसून राहिली नाही. एकता ग्रुपच्या उदय मेहता, प्रा. राम पुनियानी, असगरअली इंजिनिअर यांच्यासोबत ती मुंबईतल्या दंगलग्रस्त भागात गेली. दंगलीने दुभंगलेली मने सांधण्याचे काम तिने केले. पत्रकार म्हणून मानवी हक्कांची पायमल्ली झालेल्या एखाद्या घटनेचा छडा लावताना ती केवळ रिपोर्ताज लिहीत नाही की "रिपोर्ट'च्या थप्प्यांवर थप्प्या लावत नाही. ती घटनेच्या मुळाशी जाते. पाळेमुळे खणून काढते. अन्यायग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत राहते. हिंदू-मुस्लिम दंगे असोत की दलित-अल्पसंख्यांकावरील अन्याय-अत्याचाराच्या घटना, ती थेट घटनेला भिडते. वस्तीत घुसते. तेथील लोकांशी बोलते. तळातल्या कार्यकर्त्यांची मदत घेते. त्यांच्यावर विश्‍वास टाकते. त्यांच्याच मदतीने सत्य शोधते आणि धक्कादायक निष्कर्ष समोर आणते. तिची काम करण्याची ही पद्धतच वादळांना आमंत्रण देते. पण या वादळांनी ती हेलपाटत नाही, की कोलमडून पडत नाही आणि प्रसिद्धीचा झोत अंगावर पडूनही ऊतू जात नाही. कारण यामागे आहे अन्यायाला वाचा फुटावी आणि अन्यायग्रस्ताला न्याय मिळावा यासाठीची तिची प्रामाणिक तळमळ. म्हणूनच नेटाने छडा लावलेल्या बेस्ट बेकरी प्रकरणातील मुख्य साक्षीदार जहीरा उलटल्यावरही तिस्ता निराश झाली नाही. सौदी अरेबियातून तिस्ताला निधी मिळतो इथपासून जगात भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिला पाकिस्तानकडून मदत मिळते, अशा प्रकारच्या अनेक आरोपांना ती पुरून उरली आहे. त्यामागे आहे ती तिची दूध का दूध और पानी का पानी करण्याची वृत्ती आ णि परिवर्तनवादी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ. नांदेडच्या स्फोटांची चौकशी हिंदुत्ववादी संघटनांच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन तिस्ताने पुन्हा एक वादळ निर्माण केले आहे. आता या वादळात कोणकोण हेलपाटते ते कळेलच.

-सिद्धार्थ ताराबाई गंगाराम

"विचारवेध'च्या वेशीवर

ते रावे विचारवेध संमेलन नुकतंच पार पडलं. रायगड जिल्ह्यातल्या "वडघर' नावाच्या आडगावात. सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या निसर्गरम्य परिसरात. त्याआधी ते बारा गावचं पाणी प्यायलं. बारा गावचं पाणी प्यायल्यानंतर एक प्रकारचा बेरकीपणा किंवा प्रौढपणा येतो, असं म्हणतात. त्या अर्थाने यंदा त्याने एक-दोन मुद्दे वेशीवर टांगले. त्यावर फारशी चर्चा वगैरे झाली नाही, फक्त कार्यकर्त्यांच्या मनात वावटळ निर्माण केली. कदाचित त्या मुद्‌द्‌यांवर पुढल्या संमेलनात वादविवाद झडतीलही. निदान तशी अपेक्षा करायला हरकत नाही. अडीच-तीन दिवसांच्या संमेलनावर जागतिकीकरणाचे सावट पसरलेले. प्रत्येक विषयावरील परिसंवाद आणि व्याख्यानावर ग्लोबलायझेशनचे मळभ. जणू सर्व रस्त्यांचा "डेड एंड' ग्लोबलायझेशन! दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. अजित झा हे खमके निघाले. त्यांनी संमेलनाच्या मंडपात धीरगंभीर कार्यकर्त्यांच्या मनातलं मळभ दूर केलं. त्यांना नव्या वाटेवर आणून ठेवलं. ""ग्लोबलायझेशनचा डोलारा कधीही कोसळू शकतो, कारण त्याचा सामाजिक पायाच डळमळीत आहे'' ही जाणीव प्रा. झा यांनी कार्यकर्त्यांना दिली. संमेलनाच्या मंडपात उत्साह संचारला. प्रा. एन. डी. पाटील हेसुद्धा झा यांच्या मांडणीने प्रभावित झाले. मोहन हिराबाई हिरालाल यांनीही ग्लोबलायझेशनला शह देण्यासाठी "जय जगत'चा पर्याय सुचविला. "एनजीओं'चं करायचं काय? "विचारवेध'च्या विचारपीठावर अशासकीय संस्थांचा (एनजीओ) मुद्दाही उपस्थित झाला. तो उकरून काढण्याची आवश्‍यकता होतीच. सामाजिक कार्यकर्ते विलास सोनवणे यांनी ते काम केलं. परित्यक्तांसाठी काम करणाऱ्या संगमनेरच्या निशा शिवूरकर यांनी त्या मुद्द्याला आणखी धारदार बनवलं. चळवळीची संघर्षाची भूमिका मारण्याचं काम "एनजीओ'नी केल्याचं सत्य शिवूरकर यांनी व्यासपीठावरून सांगितलं. सोनवणे यांनीही नर्मदा बचाव आंदोलन ही "एनजीओंनी' चालविलेली चळवळ असल्याचा आरोप केला. त्यावर खुलासे आल,े पण ते तकलादू म्हणता येतील असे. खरं सांगायचं तर 15-20 वर्षांपूर्वी मुंबईत कुठे ना कुठे काही ना काही सुरू असे. विविध गट आपापल्या ताकदीवर कार्यक्रम राबवित. केव्हातरी एकत्र येऊन परिवर्तनाची भाषा बोलत. पथनाट्य करताना सफदर हाश्‍मींचा खून झाल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी पथनाट्यांची चळवळच उभी राहिली होती. त्याच सुमारास "एनजीओ'वाले डॉलर, पौंड खेळवत पंचतारांकित "समाजसेवे'ला वस्तीत घेऊन गेले. वस्तीवस्तीत राबणारे कार्यकर्ते एक-एक, दोन-दोन हजारांत त्यांना आयते मिळाले, पॅराप्रोफेशनल म्हणून. कार्यकर्त्यांची चूक काहीच नव्हती. कारण वस्तीत तलस्तरावर काम करणाऱ्या, बेंबीच्या देठापासून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला किमान त्याचं स्वतःचं पोट असतं, अशी जाणीव इतरांना होणे दुरापास्त होतं. (अर्थात याला काही अपवाद आहेत.) आज "एनजीओ'च्या कुबड्या घेतल्याशिवाय चळवळ होत नाही. चळवळीतल्या काही छोट्या-मोठ्या गटांनी "एनजीओ'वाल्यांचं मांडलिकत्व पत्करलं आहे. काहींच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या आहेत. पण या "एनजीओ'चं करायचं काय, यावर आता नीट चर्चा व्हायला हवी आणि तीही "विचारवेध'सारख्या व्यासपीठावरून. "वंचित समूहांच्या चळवळी ः सद्यस्थिती आणि भवितव्य' या विषयाभोवती एकवटलेल्या विचारवेध संमेलनात चळवळ्या कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा होता. त्यांच्या अडचणी अनंत, त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध. पण, त्यांच्या वाट्याला आली अवघी 15 मिनिटे. स्वतःला लिलावात विकणाऱ्या मजुरांच्या झुंडींना संघटित करणारा नागपूरचा विलास भोंगाडे, सीता-अहिल्येशी नातं सांगणाऱ्या परित्यक्तांना माणूस म्हणून जगता यावं, यासाठी धडपडणाऱ्या संगमनेरच्या निशा शिवूरकर, मुंबई परिसरातील कोळणींचा आवाज बुलंद करणाऱ्या सुशीला कार्डोझा, भटक्‍या विमुक्तांचा समावेश अनुसूचित जातींमध्ये व्हावा यासाठी झगडणारे व्यंकप्पा भोसले आणि "आमिष दिसलं की सापळा शोधा, तो मोडा आणि मग आमिषाचा फडशा पाडा' हा मंत्र गडचिरोली-चंद्रपूरमधील आदिवासींकडून शिकलेले मोहन हिराबाई हिरालाल, शोषित जनआंदोलनाचे ब्रायन लोबो, सुरेखा दळवी, उल्का महाजन ही सर्वच मंडळी कार्यकर्ते म्हणून वावरणारी. त्यांची स्वतःची निरीक्षणे, निष्कर्ष आहेत. ते मांडण्यासाठी "विचारवेध'सारखीच व्यासपीठे उपलब्ध व्हायला हवीत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर यांनी स्वागतपर मनोगतात एका नव्या मुद्द्यावर प्रकाश टाकला, त्याची दखल घेतलीच पाहिजे. सामाजिक बदलाला मानसशास्त्र खूप साह्यभूत ठरू शकते. मानसशास्त्राने आपला तटस्थपणा आणि अभिजन वर्गाकडे असलेला कल सोडून मानवमुक्तीच्या लढ्यात उतरले पाहिजे, ही डॉ. पाटकरांची अपेक्षा रास्तच. ""वंचितांच्या चळवळींचे एकात्मीकरण झाले पाहिजे. चळवळीने राजकारणाशी फटकून वागता कामा नये, किंबहुना नवी राजकीय लढाई उभारण्याबरोबरच नवा राजकीय पर्यायही निर्माण करण्याची गरज आहे.'' संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत सुमंतांपासून दिल्लीचे प्रा. स्मितू कोठारी, विलास सोनावणे, निशा शिवूरकर, प्रा. अजित झा, संमेलनाचे उद्‌घाटक कवी अर्जुन डांगळे आदी सर्वांनी "विचारवेध'मध्ये व्यक्त केलेली ही अपेक्षाही कालसुसंगतच आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नवथर तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती. तरुण पिढी अमक्‍या-तमक्‍यामुळे वाया गेल्याची हाकाटी सुरू असताना सामाजिक कामाला जोडून घेऊ इच्छिणाऱ्या अशा तरुण-तरुणींची "विचारवेध'मधील हजेरी हे मोठे आशादायी चित्र. अशा बोजड संमेलनांचं प्रयोजन कशासाठी, असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित होत राहतो. कार्यकर्त्यांना विचार करायला थोडीशी उसंत मिळावी. विचारमंथन घडावं, शिबिरं-परिषदा-संमेलनांतून त्यांची वैचारिक बैठक तयार व्हावी, त्यांची नाव भरकटू नये, यासाठी अशा संमेलनांचं महत्त्व. विशेष म्हणजे ही अशी संमेलने फक्त महाराष्ट्रातच होतात, हे स्मितू कोठारी यांचे निरीक्षण म्हणूनच लक्षणीय ठरते. पूर्वी विषमता निर्मूलन परिषद व्हायची. त्या निमित्ताने चळवळी मंडळी एकत्र यायची. अनुभवांची देवाण-घेवाण व्हायची. चर्चा रंगायच्या. पण नंतर परिषद बंद पडली. आता कार्यकर्त्यांची शिबिरंही फारशी होताना दिसत नाहीत. त्यामुळेच "विचारवेध'ची जबाबदारी वाढली आहे. जाताजाता आणखी एक मुद्दा. संमेलनासाठी लाखो रुपये खर्च येतो. चळवळीतल्या गटांकडे एवढा पैसा नाही. मग नाईलाजाने ज्या व्यवस्थेविरुद्ध आपण व्यासपीठावरून तावातावाने बोलतो, त्यांच्याकडेच हात पसरायला लागतात. "एनजीओ'वाल्यांपुढे झोळ्या धराव्या लागतात. केव्हा तरी हे संपायला हवं. आता तरी चळवळीने स्वतःचा निधी उभारण्याचा प्रयत्न करायला हवा. ....
-सिद्धार्थ ताराबाई गंगाराम