Wednesday, February 7, 2018

तिसऱ्या वर्गाचा प्रवासी

सूर्याला एक दिवसाची रजा हवी आहे; पण तो स्वतःला पर्याय देऊ शकत नाही, सबब रजा नामंजूर. तो चंद्राकडे जातो. "तुझी जागा मी कशी काय घेऊ शकतो?' चंद्र साफ नकार देतो. तो ताऱ्यांकडे जातो. तेही त्याला परत पाठवतात. अखेर सूर्य मिणमिणत्या दिव्याकडे जातो. दिवा सूर्याला नम्रपणे सांगतो, "नाही बुवा मीही तुझी जागा घेऊ शकत नाही; पण मी जिथे कुठे असेन तिथला अंधार मात्र दूर होईल.'
मिनी वैद यांच्या "ए डॉक्‍टर टू डिफेण्ड ः द बिनायक सेन स्टोरी' या पुस्तकात हिमांशूकुमार या मानवाधिकार कार्यकर्त्याने सांगितलेली रवींद्रनाथांची ही गोष्ट. ती पुस्तकात येते डॉ. बिनायक सेन यांच्यासंदर्भात. त्यांच्या प्रेरणेने आज अनेक दिवे छत्तीसगड नावाच्या अंधाराच्या साम्राज्यात मिणमिणत आहेत. कोण हा डॉ. बिनायक सेन? सहा-सात वर्षांपूर्वी आपल्या देशातल्या मध्यमवर्गापासून माध्यमवर्गापर्यंत सर्वांना पडलेला गहन प्रश्‍न.
अंधाराच्या साम्राज्यात चाचपडणारे, जगण्यासाठी धडपडणारे दलित, आदिवासी, मजूर, खाण कामगार... मलेरिया आणि डायरियानं घातलेलं थैमान... उपचारांअभावी तडफडणारी, मरणारी मुलं-माणसं... बस्तरची खाणभूमी बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी सुरू असलेली आदिवासींची ससेहोलपट, गावांची बघताबघता होणारी स्मशानं, नक्षलवाद्यांचा हैदोस, "सलवा जुडूम'च्या सरकारी अत्याचारांनी गाठलेली परिसीमा...आणि या पार्श्‍वभूमीवरचा युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी'चा "When The State Makes War on its Own People' हा अहवाल... हे सारं लक्षात घेतलं की कोण हा बिनायक सेन, या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं.
डॉ. बिनायक ही दंतकथा नाही, तर ते पुस्तकी चौकटीत न मावणारं सत्य आहे. वास्तविक हा बंगाली "माणूस' मराठी वाचकांपर्यंत आधीच पोचायला हवा होता; पण उशिराने का होईना, मिनी वैद यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद "असाही एक डॉक्‍टर ः बिनायक सेन यांची गोष्ट' या नावाने अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
खरं तर लेखिका एका "हीरो'चा शोध घ्यायला निघते; पण तिला भेटतो डॉ. बिनायक नावाचा माणूस. स्वतःच्या बाबतीत "हीरो' ही संकल्पना नाकारणारा आणि व्यवस्था बदलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचा आग्रह धरणारा. लेखिकेच्या दृष्टीने तो "हीरो' असला तरी तो लार्जर दॅन लाईफ नाही. तो आकाशातून टपकलेला नाही. पाताळातून आलेला नाही की, हवेतून निर्माण झालेला नाही. तो व्यवस्थेनं लादलेल्या परिस्थिती नामक अपरिहार्यतेतून घडला, हे सत्य लेखिकेला गवसतं. लेखिका पत्रकार आणि फिल्ममेकर आहे. त्यामुळे या डॉक्‍टर माणसाची गोष्ट ती सिनेमॅटिक पद्धतीने सांगते. फ्लॅश बॅक आणि क्‍लोज अप्सचा वापर करते. त्याच्या सभोवती वावरलेल्या, त्याच्या प्रेरणेने सचेत झालेल्या, त्याच्या कार्याचा अविभाज्य भाग बनलेल्या, त्याच्या जडणघडणीला हातभार लावलेल्या व्यक्तिरेखांच्या "पॉईंट ऑफ व्ह्यू'ने त्याच्याकडे पाहते. या व्यक्तिरेखा म्हणजे जगण्याला अर्थ असलेली आणि काही आदर्श घेऊन पुढे निघालेली माणसं आहेत.
आयआयटीच्या स्कॉलर पण सुखवस्तू जगणं नाकारून शोषित-पीडितांचे खटले लढणाऱ्या रणरागिणी ऍड. सुधा भारद्वाज, क्रांतिकारी कामगार नेते शंकर गुहा नियोगींच्या कल्पनेतून साकारलेल्या शहीद हॉस्पिटलमध्ये 14-16 तास राबणारे डॉ. साईबल जना, गानयारीमध्ये जनस्वास्थ्य सहयोग हॉस्पिटल चालवणारे दिल्लीच्या "एम्स'चे स्कॉलर डॉ. योगेश जैन, सर्व प्रकारच्या सरकारी दमनशाहीला तोंड देत 17 वर्षे दंतेवाड्यात मानवाधिकारासाठी लढणारे वनवासी चेतना आश्रमचे हिमांशूकुमार, "हल्ला कसाही आणि कोठूनही होवो, लढायचं', अशा निर्धारानं घरात एकटी राहणारी डॉ. सेन यांची मोठी लेक प्राणहिता, चांगलं घडवण्यासाठी लढावंच लागतं, हे तत्त्वज्ञान निरीक्षणातून शिकलेली तिची धाकटी बहीण अपराजिता आणि या माणसाबरोबरचं आयुष्य सोपं नव्हतं; पण आम्ही एकमेकांच्या साथीनं परिस्थितीशी लढलो, ही साथ बौद्घिक होती आणि भावनिकही होती, अशी कृतार्थ भावना व्यक्त करणाऱ्या डॉ. सेन यांच्या पत्नी इलिना... या सर्व व्यक्तिरेखांच्या अनुभवातून लेखिका ही गोष्ट सांगते; पण डॉ. बिनायक या हीरोसमोर या सर्व व्यक्तिरेखा दुय्यम ठरत नाहीत, तर त्याच्या लढ्यातील "साथी' म्हणून मनात घर करतात.
ही गोष्ट पहिल्या पानापासून आपला ताबा घेते. कारण या गोष्टीतील हा साधा, सरळ आणि निर्मळ डॉक्‍टर औषधोपचारांच्या पलीकडे जाऊन आरोग्य सेवेचा विचार करतो. कामगार-कष्टकऱ्यांची, महिलांची विचार करण्याची पद्धत बदलतो. समता आणि न्यायावर आधारित शांततेचा लोकलढा उभारण्याचे ध्येय उराशी बाळगतो, लोक असा लढा उभारतील तेव्हा सरकारी आणि माओवादी शस्त्रं खाली ठेवतील, असा आशावाद व्यक्त करतो. सर्व प्रश्‍न अनारोग्याच्या प्रश्‍नाशी जोडून परिणामांची पर्वा न करता व्यवस्था परिवर्तनाची भाषा बोलतो. समता आणि समानतेचं तत्त्व बारीकसारीक गोष्टींमध्येही काटेकोरपणे पाळतो. प्रत्येक कामात स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरतो. जमिनीवर पंगतीत बसून जेवतो. भांडी घासतो. मासे साफ करतो. लेकींना गणित शिकवताना छडी उगारतो. मुलींनीही डॉक्‍टर व्हावं, असं स्वप्न पाहतो, पण त्यांना त्यात गती नसल्याचं लक्षात आल्यावर हवं ते करण्याची मुभा देतो. गॅरेजमध्ये दवाखाना उघडतो, घरोघर फिरून रुग्ण हुडकून उपचार करतो. रुग्णाला सूचना देण्यासाठी दूरदूर सायकल दामटत त्याच्या घरी जातो. उशीर झाला तर तेथेच पुढ्यात येईल ते खातो. तेथेच अंग टाकतो. कमी बोलतो, विचार आणि काम मात्र खूप करतो. "सलवा जुडूम' नामक सरकारी झुंडशाहीविरुद्ध उभा ठाकतो. देशद्रोही ठरतो. जन्मठेपेच्या शिक्षेवर जातो... आणि पण तुरुंगाबाहेर येतो तेव्हा मानवाधिकारासाठी पुन्हा लढण्याचा निर्धार करतो... लेखिका अशा वेगवेगळ्या कोनांतून डॉक्‍टरला आपल्यासमोर उभा करते.
या गोष्टीत सतत खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे पुस्तकाच्या संपादनातल्या त्रुटी. अनुवादाच्या खर्ड्यावर संपादकीय नजर फिरणं आवश्‍यक होतं. "खरं म्हणजे हे फक्त वेळ भरण्याचं काम होतं.' "वातावरण गरम होतं, आणि दुपारी झोपायची ती वेळ होती.' अशी वाक्‍ये खटकत राहतात. They are the real keepers of the faith Binayak and Ilina have reposed in them या वाक्‍याचा अनुवाद "बिनायक आणि इलिना यांनी त्यांच्यावर जो विश्‍वास दाखवला होता, त्याचे ते खरे रखवालदार (किपर्स) होते' असा; तर "Binayak wasn't one of those people who had a conversion experience at CMC' या वाक्‍याचा अनुवाद "बिनायक अशा लोकांमधले एक होते ज्यांना सीएमसीमध्ये "श्रद्धांतराचा' अनुभव आला नव्हता', असा करण्यात आला आहे. या उदाहरणांवरून अनुवाद काही ठिकाणी किती तांत्रिक आणि तकलादू झाला आहे, ते लक्षात येईल. या त्रुटी सोडल्या तर या अनुवादामुळे मराठी वाचकांना निदान हिमालयाएवढी छाती असलेल्या आणि एव्हरेस्टची उंची गाठलेल्या माणसाची ओळख होते.
डॉ. बिनायक-इलिना सेन, डॉ. प्रकाश-मंदाकिनी आमटे, डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे किंवा डॉ. अभय-राणी बंग हे सारे एकाच गाडीचे प्रवासी आहेत. त्यांचा प्रवास, पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचा पर्याय नाकारलेल्या नाबेलविजेत्या डॉ. अल्बर्ट श्‍वाइत्झर यांच्याच तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून सुरू आहे.
प्राध्यापकी, संशोधन आणि पुस्तक लेखन अर्ध्यावर सोडून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आणि आफ्रिकेतल्या आदिवासींचं जगणं सुसह्य करण्यासाठी आयुष्यभर खपलेल्या डॉ. श्‍वाइत्झर यांना एकदा रेल्वे कर्मचाऱ्यानं विचारलं, "डॉक्‍टर, तुम्ही लाकडी बाकांच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास का करता?' त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या विचारांचं मर्म सांगणारं होतं. ते म्हणाले, "Because there is no fourth class anymore.' डॉ. बिनायक यांचा प्रवासही तिसऱ्या वर्गातून सुरू आहे. वाचताना तो एकीकडे मनाचा ठाव घेत जातो तर दुसरीकडे तो अंतहीन असल्याच्या जाणिवेने आपण अस्वस्थ होत राहतो.
- सिद्धार्थ ताराबाई 

No comments: